ठाणे, दि.(जिमाका) :- समाजातील अज्ञानरुपी अंधार नाहीसा करुन तळागाळातील प्रत्येक गरजू वंचिताचे कल्याण व्हावे, त्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. “लिडकॉम आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, ठाणे यांच्या वतीने टाऊन हॉल, कोर्ट नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.नागेंद्र मंचाल, MCED चे श्री. कांदळगावकर, श्री.सुबोध बायस, लिडकॉमचे पालघर व्यवस्थापक श्री.दगडखैर हे मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.शिनगारे पुढे म्हणाले की, शासनाचे विविध विभाग, महामंडळे, बँका गरजू लाभार्थ्यांना यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी सक्रिय आहेत. बँकांनी सहकार्याची भूमिका घेऊन जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना कर्ज मंजूरी द्यावी. महामंडळांनी शिबिरे/मेळाव्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजूंना लाभ द्यावा. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील शेवटच्या गरजू व्यक्तीच्या विकासासाठी अतिशय सकारात्मक आणि संवेदनशील आहेत. त्यांचे आपण सर्वांनी अनुकरण करायला हवे. सकारात्मकतेने सर्वांनी गरजू व्यक्तींना मदत करून त्यांचा विकास साधायला हवा. गरजू लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करून शक्य त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, मात्र त्याचबरोबर आपल्या कामाचा दर्जा, उत्पादनाचा दर्जा उच्च प्रतीचा असेल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. उत्पादन आणि त्याची विक्री व्यवस्था उभी राहायला हवी. शेवटी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे तसेच लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांचे सकारात्मक काम सर्वांना ऊर्जा देणारे मार्गदर्शक व प्रेरक आहे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी देखील याच सकारात्मकतेने कार्यरत असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या प्रस्तावनेत जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयामार्फत चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) इ. व्यक्तींचे जीवनमान उंचाविणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे महामंडळ काम करते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.नागेंद्र मंचाल, MCED चे श्री. कांदळगावकर, श्री.सुबोध बायस, लिडकॉमचे पालघर व्यवस्थापक श्री.दगडखैर या मान्यवरांनी चर्मकार समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तसेच एम.सी.ई.डी मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता प्रशिक्षणाची तसेच बँकाची भूमिका या विषयांची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्ज मंजूरी झालेल्या काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वितरण करण्यात आले, तसेच महामंडळाच्या योजनांचा लाभ घेवून यशस्वी वाटचाल करणाऱ्या लाभार्थ्यांना गौरविण्यातही आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक श्री.अमर पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीती सूर्यवंशी यांनी केले.

One thought on “शासन समाजातील प्रत्येक गरजू वंचिताच्या कल्याणासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *